जळगाव, दि.०७प्रतिनिधी – हवामान बदलासह मानवनिर्मित आपत्तींमुळे शेती ही न परवडणारी होत आहे, ही नकारात्मकता तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती केल्यास बदलू शकते, मागील काही वर्षात शेतीमध्ये खूपच बदल झाले आहेत, यातून भारताचे विकसीत होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. मुलांमध्ये नेतृत्व कौशल्य विकसित करणाऱ्या ‘फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया’ (FALI) हे आधुनिक कृषीक्षेत्राचे ‘पॉवर ऑफ हाऊस’ म्हणून पुढे येत आहे असा सुर उद्योजक प्रतिनिधी, शेतकरी व फाली मधील विद्यार्थी यांच्यात झालेल्या संवादात उमटला.
जैन हिल्स येथे फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया च्या १२ व्या वार्षिक अधिवेशनातील अंतिम टप्प्याची आज सुरवात झाली. शिवार फेरीत टिश्यूकल्चर रोपांचे तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी जैन हायटेक प्लॉन्ट फॅक्टरी, टिश्यूकल्चर लॅब, प्रक्रिया उद्योग समजण्यासाठी जैन फार्मफ्रेश फूडच्या कांदा निर्जीलकरण प्रकल्प, आंबा प्रक्रिया प्रकल्पा सह अन्य विभागांना विद्यार्थ्यांनी भेटी दिल्यात. यानंतर गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ‘खोज गांधीजी की’ या ऑडिओ गाईडेड संग्राहलयातून महात्मा गांधीजींचे विचार आत्मसात केले. भविष्यातील शेती म्हणजे माती विरहित शेती ‘फ्यूचर फार्मिंग’, हायड्रोपोनिक फार्मिक अनुभवली. यानंतर झालेल्या गट चर्चेत शेतकरी, उद्योजकीय प्रतिनिधींशी फालीच्या विद्यार्थ्यांनी संवाद साधला. परिश्रम व आकाश ग्राऊंडवर झालेल्या चर्चेत शेतकरी नारायण पाचपांडे, उमाकांत भारंबे, सागर पाटील, पंकज घाटे, भागवत बाजीराव पाटील, विशाल पाटील, क्रिष्णा पाटील यांच्यासोबत विद्यार्थी गौरी त्रिपाठी, श्रृती चौहान, सिद्धी गावकर, शिवा देवसाकर, सेजल पाटील, प्राजक्ता भार्गव यांच्यासह विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. यात त्यांनी कार्बन क्रेडिट शेती, महिलांचे शेतीमधील योगदान, ठिबक सिंचनच्या माध्यमातून पाणी बचत व खतांचा कार्यक्षमतेने वापर, टिश्यूकल्चर तंत्रज्ञानातून निर्यातक्षम उत्पादन, प्रक्रिया उद्योगवाढीसाठी लागणारे घटक, पोल्ट्रीउद्योग, ऑटोमेशन व आर्टिफेशियल तंत्रज्ञामुळे शेतीतील बदल, उत्पादन ते ट्रेडिंग पर्यंतची साखळी यासह नवनविन कृषी उद्योजकीय कल्पनांवर चर्चा करण्यात आली. प्रश्नोत्तरातून फालीच्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांकडून शेतीमधील बारकावे तसेच आव्हाने आणि त्यावर मात करण्यासाठी लागणारे कौशल्य समजून घेतले. आकाश ग्राऊंड येथे झालेल्या शेतकरी संवादाचे सुत्रसंचालन जुली पटेल यांनी केले. तर परिश्रम हॉल येथे झालेल्या गट चर्चेचे समन्वयन शाबोर्नी पोद्दार यांनी केले.
