रावेर- (प्रतिनिधी) – रावेर तालुक्यातील कुंभारखेडा, गोरगाव व चिनावल परिसरात शनिवारी सायंकाळी अचानक जोरदार वादळासह पावसाने धुमाकूळ घातला. ताशी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडली असून काही ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाला आहे.
वादळाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला असून केळी, मका तसेच इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. काही घरांवरील पत्रे उडून गेल्याने नागरिकांचेही नुकसान झाले आहे. गावातील अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे पडल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, संबंधित विभागाकडून नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
